Thursday, 19 December 2013

याला काही अंत असायला हवा ना?

याला काही अंत असायला हवा ना?
आत्ता काही वेळापुर्वी मुंबईतील झोपडपट्टीतील नागरीकांसमवेतची बैठक संपविली. विषय होता, ४०/५० वर्षांपासून मुंबईच्या झोपडपट्टी  रहात असलेल्या नागरीकांना प्राथमिक सुविधा नाहीत, त्या मिळाव्यात म्हणून गेल्या विसेक वर्षांपासून कायद्याची, आंदोलनाची लढाई लढत आहेत. अजून ही यश पदरात नाही. जिथे जातात तिथे एकच अडचण ती  म्हणजे सदर जागेवर असलेला "राजकीय बिल्डर"चा दबदबा! 

पण अशा दबद्ब्याचा अर्थ हा तर नाही ना की नागरीकांना त्यांच्या मूलभूत गरजांपसुन दूर ठेवावे. किंवा सामाजिक प्रवाहातील बहिष्कृत भाग म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत रहावे, तेही एवढी वर्ष! 
या प्रकारच्या व्यवहाराला स्थानिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधिंना घेवून वाचा फोडली, आंदोलन चौकात (आझाद मैदान जसा "ताहीरी स्क्वेअर"  तसा हा!) तरीही प्रशासन जागचे हलत नाही. 

१९७९ सालात शासनाने सादर वस्ती झोपडपट्टी "गलिच्छ वस्ती" म्हणुन जाहीर केले, निदान त्यानुसार तरी सुविधा उपलब्ध व्हायला हव्या होत्या, त्याही नाही. गेल्या काही ७/६ वर्षांपुर्वी (२००५ साल असावे) स्थानिक लोकप्रतिनिधीनी पावसाळी तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था केली. आज अवस्था अशी आहे की 'भीक नको पण कुत्रं आवर' असं म्हणाव लागतंय. कारण या गटारांची अवस्था काय? त्याची स्वच्छता काय? याचे कुणालाच काही पडलेले नाही. आजही लोकांना संध्याकाळी घराकडे जाताना गुढघाभर पाण्यातून जावे लागते, मग विचार करा पावसाळ्यात काय स्थिती असेल? त्यातच घर दुरुस्तीची परवानगी १००% नाकारण्यात येते. त्यामुळे प्रत्येक घर बाहेरील रस्त्याचा मानाने एक ते दिड फुट खड्यात आहे. ज्याला रस्त्याच्या बरोबरीला आणणे गरजेचे आहे, पण ही गरज समजतील तर ते लोकप्रतिनिधी/ प्रशासन? 

वस्तीच्या तोंडावर उभी राहिलेली अत्याधुनिक शाळा. वस्तीच्या मागील बाजुस असलेल्या इमारती. शेजारी असलेले मैदान (?) आणि मंडई हे सर्व उभे रहात असताना लोकप्रतिनिधी/प्रशासन या बांधकामाचे कैवारी असते परंतु जेव्हा सार्वजनिक सुविधा पुरविण्याची वेळ येते तेव्हा यांचे कायदे आडवे येतात. 

सर्वात मोठा विनोद म्हणजे मतदान! 
निवडणुकीच्या प्रत्येक उत्सवासमयी "भिकारी" हात जोडुन उभे रहात असतात, त्यांना कसली लाजलज्जा नसते, की त्यांना कशाचे घेणंदेणं नसतं. ना माणुसकीचे ना व्यवस्थेचे! ही मंडळी आपल्या राजकीय चौकोनात मशगुल असतात. कावळ्या/कोल्ह्याप्रमाणे वाट बघत असतात. सावजाची! जेणे करून एखादा अपघात व्हावा आणि आम्ही त्याची राजकीय वाटणी करून त्या भांडवलावर आपली शक्ती दाखवावी. मग ह्यांचा सुरु होतो, तमाशा! ज्यामध्ये "बतावणी" सोबत "जंगी सवाल जवाब" चा खेळ करतात. अगदी जोपर्यंत नवीन "सावज" दृष्टीपथास येत नाही तोपर्यंत. बर यांची जाहिरातही मोफत, तेही ठरलेले! कोणती बातमी केव्हा उपयोगी पडेल याचा बरोबर हिशोब मांडणारे "हिशोब-तपासनीस" यांचाकडे खो-याने असतात. 

पण या हिशोब जुळविणा-या  कारकुनांना सामान्य नागरिकांच्या व्यथा दिसत नाही, का त्यांना अश्या व्याधींकडे दुर्लक्ष करण्यासाठीच जन्माला घातले आहे की काय? कोण जाणे? ह्याचेच उत्तर शोधले पाहिजे, जे आजपर्यंत सापडले नाही. हा! आता राजकारणी का असे वागतात ते कळालयं किंवा त्यांची वागण्याची त-हा ही त्यांना वडिलोपार्जित मिळाली/लाभली आहे, कारण राजकारण म्हणजे " P T Case " चा प्रकार आहे. जशी महापालिकेत वडिलांच्या जागेवर मुलगा किंवा मुलगी कामावर चढु शकतात तशी. 

याला काही अंत असायला हवा ना? मुंबईचे मालक, ज्याच्या जिवावर मुंबईच्या सौंदर्याचे आपण गोडवे गातो, त्या मुंबईत महिलांना, तरुण मुलींना संध्याकाळ होण्याची, अंधार पडण्याची वाट बघावी लागते. का तर परसाकडे (नैसार्गिकविधीस ) जायचे असते. आणि तेही समुद्रावर! बर या लोकांनी अशाही स्थितीत एक वैशिष्ट जपले आहे ते म्हणजे पुरूषांकरिता व महिलांकरिता अशी वेगळी ठिकाणं स्वत:हून आखली आहेत. अगदी पाहुण्याला सुध्दा त्याची ओळख करुन द्यायची आवश्यकता पडत नाही. अशा शिस्तप्रिय नागरीकांचा सामाजिक सुविधांसाठीचा मूलभूत अधिकार डावलला जात असेल तर नको का या बातमीदारांनी इकडे लक्ष द्यायला? तुम्ही जो तुमचा व्यवसाय निवडलाय तो आधी आपल्या लोकशाहीचा खांब आहे मग तो तुमचा व्यवसाय ठरतो. आणि हा खांब जर का कोण्या सरंजाम्याच्या हातातली काठी बनू पहात असेल तर अशा व्यावसायिकतेचा धिक्कारच केला पाहिजे!  

या मुंबईच्या मालकांचे खाद्य पदार्थ आपण आवडीने खातो, पण जेव्हा त्यांना काही द्यायची वेळ येते तेव्हा आपण " C R Z" ची भाषा वापरतो. ही भाषा वापरताना "गब्बर भांडवलदार"  आपल्याला दिसत नाही. त्याच्यासाठी "Red Carpet" तर भूमिपुत्रांसाठी Red Mark. ह्यांच्या बायकांना "जग्वार फ़िटिंग" असलेले शौचालय पण झोपडीत रहाणा-या बाईला उघडा परिसर, का? काही वेगळेपण असतं का तुमचाकडे जे लपविणे गरजेचे आहे? की झोपडी रहाणारी बाई म्हणजे फक्त निवडणुकीत उपयोगी असणारी मतदार? 

आम्ही या चळवळीला सुरवात केली आहे, जोपर्यंत या सा-या व्यथा आपण एकोप्याने  मांडत नाही तोपर्यंत ही व्यवस्था आपल्याला काही मिळुन देईल असे वाटत नाही. 

चला तर मग सामील होऊ "SanitatioNow"  चळवळीत,
"अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वच्छ शौचालय - प्रत्येक नागरिकासाठी "
 या घोषणेसह ……… 

Triratna  Prerana  Mandal  आणि Observer Research Foundation 
मुंबई 















Wednesday, 18 December 2013

........ कारण खरा "एकसंध" भारत इथंच नांदतो!

कारण खरा भारत इथंच नांदतो! 
मी जरा वेगळेच काही लिहायचे असा प्रयत्न करतो आहे. यासाठी पुस्तकातील भाषा जरी माझं माध्यम असले, तरी मी तिच्या शुध्दतेत वा व्याकरणात न अडकता, सरधोपटपणे मनातल्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लिहिताना सामजिक परिस्थितीला तेही आज आणि आसपास घडत असलेल्या घटनांना माझ्या शब्दांत शब्दबध्द करावे, जेणेकरुन त्यातून काही नाही, तरी परिस्थितीपासून दूर असणा-यांना किंवा जे अनभिदन्य आहेत, निदान त्यांना तरी त्याची माहीती होईल, हाच उद्देश लेखाचा असणार आहे, म्हणुन;

कागदावरची झोपडपट्टी आणि वास्तव्यातली झोपडपट्टी यात जमीन आसमानचा फरक असतो. या फरकातून जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आपल्याला त्यात असे अनेक कांगोरे सापडतात, जे आपणाकडुन पाहिले ही जात नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर आजारपणापासुन सुरुवात करता येईल. मराठी वृत्तपत्रात आलेली बातमी फार बोलकी आहे. मुंबईतल्या गोवंडी आणि धारावी परिसरात "टीबी" मोठ्या "जोमाने" पसरत आहे. यामध्ये तेथिल ६० %  जनता या आजाराने बेजार असून, हा "टीबी" औषधांनाही जुमानत नाही. म्हणजेच काय तर कदाचित हा आजार फार पूर्वीच तेथिल लोकांना जडलाय, आणि त्यामुळेच त्यावर औषधांचा असर होत नाही. हे मान्य करावंच लागतयं.

आणि अशा अनेक झोपडपट्ट्या मुंबईत (गुण्यागोविंदाने?) नांदताहेत, ज्यांच्याबाबत ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. आज जरी शासनाने झोपड्यांचा पुनर्विकास(?) सुरु केला असला तरी त्याला "विकास" म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती केल्यासारखं होईल. कारण ज्या झोपड्या जमिनीवर होत्या त्यांना आपण चौथ्या, सातव्या माळ्यावर "टाकले" आहे.(बहुतेकांना त्यांच्या अनिच्छेने ), सोबत आजारपण, बेरोजगारी, व्यसनाधिनता, हे "आंदण" दिले आहेच……… (त्यांना पूर्वाश्रमीचा विसर पडु नये म्हणुन शासनाने वाहिलेली काळजी असेल) ! असो,

तसं पाहीलं तर गावाकडे असलेली बेरोजगारी घालविण्यासाठी शहराकडे यायचे, मिळेल त्या अवस्थेत बस्तान बसवायचे, प्रस्थापित नेत्याला दादा-बावा करून राहुटीची झोपडी करायची आणि राहुटीवजा झोपडीवर माळा करुन आणखी काहींना (गावाकडून आलेल्या) जागा करुन द्यायची. हे सर्व "दादा-बावा-भाई-भाऊ-ताई-वाहिनी-दीदी" यांच्या कृपेनेच! या "बिचा-यांना" घर मिळाल्याचा आनंद येवढा असतो की, त्या आनंदाच्या भरात  लोकं हे विसरतात की खाल्लेलं "साफ" कुठं करायचं? मग सुरु होतो अस्वच्छ वातावरणाचा खेळ!

जागोजागी (असं म्हणण्याची पध्दत आहे म्हणुन) असलेल्या(?) खुराड्यांमधे (शौचालयं) " पोटं साफ " करण्याचा दिनक्रम सुरु होतो. साधारण चार/सहा लोकांच्या वापरानंतर शेवटच्या (कधी तेरा/चौदाव्या) क्रमांकावर असणारा व्यक्ती Urgent Call मुळे खुराड्याच्या "मागचा" आसरा घेतो, आणि मोकळ्या वातावरणाचा आस्वादही! पण महिलांचे काय? त्या बिचा-या घरी परतायला उशीर नको म्हणुन खुराडेही टाळतात आणि अंधाराची प्रतीक्षा करीत असतात, तेही मुंबईसारख्या अतिउच्च शहारात!
       
हे असे स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतर ही सुरु रहाणार, की आणखी एका गांधींना जन्माला यावे लागणार! कारण परकीयांची गुलामगिरी संपवायला १५० वर्ष, अंधश्रद्धा कायद्यासाठी १४ वर्ष, लोकपालसाठी ४६ वर्ष, तर मग खुराड्यांचे "स्वच्छता गृह" व्हायला किती वर्ष लागणार?

आज महानगराची घनता एवढी झाली आहे की, गुदमरायला होतं. असलेल्या मोकळ्या जागा जश्या "पोट साफ" करायला वापरतात त्यापेक्षा अधिक त्या पैसेवाल्यांच्या घशात जाताहेत. तरीही आम्ही लोकं ढिम्मं! "नेमिची येतो पावसाळा!" या उक्तीनुसार येणा-या निवडणुकीसाठी रोजंदारी करायला आम्ही मोकळे!

अगदी ८रुपयाच्या वडापाव पासून ३०/४० रुपायाच्या दारूसाठी आम्ही नेत्यांची थुंकी झेलण्यात आमची ६६वर्ष खर्ची घातलीत, त्याचे काही सोयरंसुतकं नसतं आम्हाला?
कार्येकर्ते टीबी सारख्या दुर्धर आजारांची कारण शोधण्याऐवजी (औषध-पाण्यासाठी?) "कार्यालया"त लाचार होताना दिसतात.

आपली पिढी बरबाद होतच आहे, परंतु येणारा भारत "आजारी/अशक्त" जन्माला येणार नाही, याची चिंता आज कोणी करायची झाली; तर फक्त आणि फक्त ती झोपडपट्टीवाल्यांनीच! कारण खरा भारत इथंच नांदतो!

लोकशाहीत मिळालेल्या मतदान अधिकाराचे  महत्व सर्वात जास्त इथल्या अशिक्षित/अर्धशिक्षित लोकांना समजले आहे. या सकारात्मक भावनेचे रुपांतर जर आपण "देशशक्ती" म्हणुन केले, तर तुमच्या आमच्या स्वप्नातली "मुंबई" जास्त अवघड नाही!

पण यासाठी, 'आवाज कुणाचा…..... , आगे बढो………. ' किंवा, 'कोण म्हणत देणार नाही ……… ' अशा घोषणांची नव्हे तर प्रत्यक्ष लोकांत मिसळण्याची गरज आहे. त्यांच्या भावना, गरज आणि अडचणी समजून सोडविण्याची आवश्यकता आहे.  जय हिंद!

-  दयानंद जाधव











Tuesday, 17 December 2013

नमस्कार,
आज माझा स्वत:चा ब्लॉग सुरु करतोय. एवढ्याचसाठी की, मनात साठविलेल्या गोष्टी अधिक काळ साठून राहिल्या तर त्याचा ना मला उपयोग ना अन्य कुणाला? त्या जर जगासमोर आल्या तर त्यातून काही चांगले निष्पन्न झाले तर!
धन्यवाद!!